पुस्तकाचे नाव : उल्का
प्रकार : कादंबरी
लेखक : वि.स.खांडेकर
प्रथमावृत्ती : १९३४
सद्य प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या : १७०
एकूण २५ भागांत रचलेली ' उल्का' कादंबरी ; तिच्याविषयी थोडं काही ,
उल्का तत्वं शिकवून जाते. मन भरून येईतोवर प्रत्येक पात्र समोर येऊन बोलू लागतं तेव्हा , जाणीव होते की आपण वाचताहोत ही कलाकृती कल्पित का असेना पण भाव - बंधांच्या प्रवाहात वाहवून नेणारी होडी आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ' काहीतरी केलं तरंच कर्तृत्त्व राहतं' यापेक्षा ' तत्वानं जगला तर खरा माणूस उरतो ' यावर अधिक विश्वास बसतो.
उल्का , तशी साधी , सरळ , सोपी मुलगी ! हुशारी जन्मतःच तिच्यात असावी पण ; भावनांच्या घुसळणीत हुशारी टिकेल कशी हेही तितकंच खरं !
या कादंबरीत ' उल्का ' नावाची मुलगी , तिचे शिक्षक वडील ज्यांनी पुनर्विवाह केलेला ; तिचे काही सवंगडे आणि कालांतराने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर समोर येणारे पुरुष ; वसंत , माणिकराव , बाबुराव आणि चंद्रकांत !
चंद्रकांताची चुणूक भलतीच महान ! तो , त्याची पत्रं , त्याचा समुद्र , त्याचे भाऊ , त्याची उल्का , त्याची कल्पना , त्याचा निडरपणा आणि त्याचं देशप्रेम ; हा सारा प्रवास अस्सा डोळ्यांसमोर घडतोय असा दिसू लागतो.
कोकणचं , समुद्राचं विसंनी केलेलं वर्णन , भाऊंच्या मतांची अर्थात तत्वांची मांडणी इथपासून ते चंद्रकांताचं अधिक प्रेम कोणावर हे अवघ्या सहा - सात ओळींच्या संवादातून सांगून क्षणात मनाला एखाद्या काट्याचा प्रेमळ ओरखडा उमटतो आणि उल्केप्रति प्रेम निर्माण करून जातो. बाकी इतकंच की , विसंची फार फार ओढ वाटू लागते.