Thursday, June 24, 2021

अमृतवेल



मोगरा फुलला... मोगरा फुलला...


नंदा खूप आत रुतून बसलेय. मनाच्या आत आत डोकावून पाहिलं की दासबाबूंचा आवाज येतो , प्रीतीचा अर्थ सांगणारा तो थोर माणूस मनाला फार फार भावतो. दादा नंदेची पत्रं , तिने लिहिलेले कागदाचे कपटे वाचत , ते फार आवेगाने काळजात आपली जागा तयार करतात. माई आणि मिलिंद नंदाच्या खूप जवळचे आणि हक्काचे , तिला अंततः समजून , उमजून घेणारे.

नंदाचं मृत शेखरमध्ये अडकून राहणं आणि स्वतःला बंदिस्त करून घेणं समोर येतं तेव्हा , कित्येक अडकलेली पाखरं पंख फडफडत पिंजऱ्यात आयुष्य काढत असतील याची प्रचिती येते. आयुष्याला स्वतःच्या क्रूर दोरांमध्ये अडकवून घेऊन साध्य तरी काय होतं ? इतक्या मोठ्या , अनुभवी , थोर माणसांच्या आयुष्याचं सार वाचूनही आपल्या आयुष्यात निरर्थक हेतू ठेवून जगणं म्हणजे एकप्रकारे आत्महत्याच नाही का !

काही काळाने नंदा वसुकडे जाते. काहीतरी बदल म्हणून जाते. दादांनी सांगितलेलं मनात साठवून जाते. स्वतःचं दुःख बाजूला सारायला जाते. मधुरेशी तेव्हा तिची नाळ जुळते. बापू आणि सावित्रीआईसारख्या निरामय माणसांना भेटून नंदा कृतार्थ होते.

हे इथं शब्दांत मांडतानाही धडधड होतेय. कंठ दाटून येेेतोय. नंदा भेटते देवदत्त नावाच्या महाशयांना. पुस्तकांना जीवनाची बाग आणि त्याच पुस्तकांना स्मशान संबोधनारा हा देवदत्त 'चंचल' या त्याच्या हरिणीशी बोलतो 'माझे दोनच मित्र एक तू आणि दुसरा मृत्यू' तेव्हा कोणीही अश्वत्थामी हृदय असणारी व्यक्ती त्याच्यासाठी मेणबत्तीचं मेन गळून जावं तशी गळून जाते. त्याच्या विचित्र असण्याला , त्याच्या अहंकाराला , गूढ तटस्थपणाला , त्याच्या काटेरी असण्याला , विजेसारख्या अस्थिरतेला , त्याच्या साऱ्या साऱ्या रुपांना क्षणात स्वीकारून भाळून जाते. विसं तुम्ही देवदत्त फार फार खोल कोरून बसेल असा निर्माण केलात. तो दुःखी आणि आयुष्याला विटलेला , आत्महत्येच्या कल्पनेने ग्रासलेला असला तरीही त्याच्यावर भरभरून प्रेम करावेसे वाटते.

नंदा जशी त्याच्या प्रेमात न पडता , त्याच्यावर प्रेम करते तसं प्रेम करण्याची ताकद प्रत्येक माणसात आहे ; गरजेचं इतकंच आहे की , वासनेला प्रेम समजून त्या दोहोंचं मिश्रण होऊ देऊ नये. देवदत्त आणि नंदा यांच्यातली प्रीतीची चाहूल वाचकाला ज्या क्षणी जाणवते त्या क्षणी प्रेमाकडे पाहण्याची त्याची वृत्ती पुरी बदलून जाते. नंदा कधी भेटली तर तिला एवढेच विचारेन "देवदत्ताला आत्महत्येच्या सततच्या विचारांमधून तू दूर केलेस खरे पण ; त्याला सहवासाने दूर का लोटतेस तू ? भाऊबीजेला बोलावून ओवळणीत त्याचे अश्रूच का हवेत तुला ? 'सुख माणसांना दुखतं' तसं काही झालं का तुला ?"

एखाद्या कल्पित कथेने श्वास गहिवरून यावेत असा क्षण फार दुर्मिळ असतो ; मात्र इथे तो येतो. तेव्हा शब्द स्तब्ध होतात आणि फक्त डोळे बोलतात , मन भडभडून वाहत असतं ; अबोल राहून. देवदत्तासाठी रडावंस वाटतं. वसू देवदत्ताला भेटण्याअगोदर ; नंदेला खेचून त्याच्याकडे आणावं असं वाटतं आणि त्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या दोन प्रतिमांमध्ये मन हरवून जातं... हॅमिंग्वे आणि विवेकानंद...!!

वि. सं. खांडेकर यांची १९६७ साली प्रकाशित झालेली 'अमृतवेल' कादंबरी अवघ्या १६० पानांची. आवर्जून वाचा. वाचून दुःख झालं तर त्या दुःखाने अंतर्मुख व्हाल आणि आत्मपरीक्षण कराल अशी अपेक्षा. आनंदाने सुखी झालात तर , आठवणीने तो आनंद वाटा ; आनंद वाटण्याएवढा आनंद आणखी कशात नाही !

Saturday, June 19, 2021

सुखाचा शोध


      

                                १९३९ मध्ये प्रकाशित झालेली , मराठी साहित्यातील पहिले 'ज्ञानपीठ' मानकरी , 'ययाती'कार विष्णू सखाराम खांडेकर यांची 'सुखाचा शोध' ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातील मानाचा तुरा आहे. विसं म्हणजे सर्वकाळ प्रेम करावं अशी जीवनदायी लेखनसमृद्धी ! मनुष्यजीवनातील त्रिवेणी संगम म्हणजे 'सुखाचा शोध' याचं कथानक. 

                               या कथेत 'आनंद' त्याचा मोठा भाऊ 'आप्पा' , आप्पाची मुलं 'मीरा' आणि 'बाळ' , 'आई' , आनंदची बायको 'माणिक' , माणिकचा मित्र 'धनंजय' , आनंदची भक्त 'उषा' आणि एक नटी 'चंचला' या व्यक्तिरेखा आहेत.
                               आप्पा हा माणूस म्हणजे 'आजारी पत्नीस , तुझ्याहूनही माझी मातृभूमी आजारी आहे' असं रोखठोक सांगणारा मात्र ; कीर्तीच्या वाऱ्यात नाती आणि घर विसरलेला मनुष्य. आप्पाची दोन मुलं आईविना ; त्यामुळं मीरा आणि बाळ यांना आनंदाचेच अधिक लाड असत. आप्पाचा सर्वाधिक वेळ हा सभा , संमेलनं , व्याख्यानं यातच. आप्पा म्हणजे प्रसिद्धीची चादर पांघरलेला समाजसेवक. आई देवाघरी गेल्यामुळे व्याख्यानं खोळंबलीत म्हणून त्याच आईवर खापर फोडणारा अवलिया.
                               भय्या हा आनंदाच्या वारलेल्या बहिणीचा मुलगा ज्याचा सांभाळ आनंदाच्या आईने उचलला होता. त्याला भारी सिनेमांचा नाद. चंचला नावाची नटी त्याला भुरळ पाडी. तो नेहमी नट्या आणि सिनेमांमध्येच रमलेला असे.
                               आई म्हणजे थोडक्यात आनंद मानून समाधानानं जगणारी धीट बाई. मुलगी गेल्यावर जावयाशी भांडून नातवाला आपल्याकडे तिनेच आणलं होतं. आनंदावर तिचा फार फार जीव. आनंदही तिच्यासाठी , तिला हवे ते करायला तयार असे. मात्र आनंदाचे लग्न उरकून होते न् होते ; आई देवाघरी जाते.
                               उषा म्हणजे भावबंधांच्या दोन्ही टोकांकडून वंचित राहिलेली निर्विकार मूर्ती. स्वतःच्या आयुष्याच्या भोगांचा अतिरेक झाल्यावर त्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बोटीवरून जीव देताना आनंद तिला वाचवतो आणि पुढे ती तिच्या देवाला म्हणजेच आनंदला वाचवते. उषा फार कमी बोलूनही , फार खोलवर मृदुमयरित्या वाचकाच्या मनावर रुतून बसते. अखेरीस माणिकच्याही !
                               माणिक ही पाण्याखाली दबलेल्या बोटीच्या अर्ध्या भागासारखी ! ना तिला कधी वर येता आले , ना तिला कधी पूर्ण डुंबता आले. किनारा येईतोवर ती दबून राहिली आणि साऱ्या सुखाला मुकली. धनंजयच्या न येणाऱ्या सादेला हाकारत आनंदसोबतच्या संसारसुखाला डावलून अधुरी जगली. खरंतर माणिक गृहितकांच्या खेळात अडकून गेली. मनाप्रमाणे एकही गोष्ट होईना तेव्हा उषेच्या निस्वार्थ 'असण्या'ने खजील होऊन स्वतःच्या सुखाला अखेरीस माणिकने स्वीकारले.
                               चंचला ही वेश्येच्या आवरणातून एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुनियेत रमली खरी पण ; अंतापर्यंत सुखाच्या फक्त शोधातच राहिली. स्वतःच्या सौंदर्यावर स्वतःच भाळून आयुष्याला जुगार समजणारी चंचला नेहमी असमाधानीच राहते तेव्हा तिच्यावर दया येते. ना तिला माणिकची बुद्धी होती ना तिच्यात उषेचा निर्विकार अंश. ती वाहत राहिली आणि दुसऱ्याला उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात स्वतः उध्वस्त होत गेली.
                               आनंद हा व्यक्तिगत सुख बाजूला ठेवून कौटुंबिक आणि सामाजिक सुखाचा विचार अधिक जवळून करणारा अळवावरचा थेंब म्हणावा लागेल. त्याची स्थिरता उषेमध्ये होती हे कळायला आनंदाला फार फार अस्थिरतेचा प्रवास करावा लागला. दिव्यातलं तेल संपलं की , दिवा जळणं थांबवतो तसंच काहीसं आनंदचं झालं ! माणिक , चंचला की उषा यात त्याची फरफट झाली. सुखाच्या शोधात कैक दुःखं त्यानं पचवली. तरी त्यानं सुख पेरणं राहू दिलं नाही ; तो सुख पेरत गेला आणि उषेच्या असण्यात ते उगवत गेलं. उषा प्रत्येकवेळी खिंडीत कोसळणाऱ्या आनंदला वाचवणारी शिडी होती. त्यांच्यातले दहाचे ठोके भक्तिरूपी प्रेमाला दृढ करत राहतात हेही तेवढेच खरे !
                              कधी कधी शब्दांचं वाहणं पुरं आटून जातं , तसं ही कादंबरी वाचल्यावर होऊन जातं. त्यातला सारा सार पिऊन तो प्रतिबिंबित करणं भारी जड जातं. म्हणून ; या कादंबरीतील भावलेले शब्दसंघ , कुठेतरी कोरून ठेवावीत अशी वाक्यं , इथे मांडण्याचा प्रयत्न करतेय ; आपल्यालाही ते जीवनमंत्र मोहून टाकतील यात शंकाच नाही.

"पानांआडून डोकावणारी कळी किती मनोहर दिसते , विरळ धुक्यातून चंद्रकोर किती मोहक वाटते , लाजेने तरुणीही आकर्षक होत असावी."

"नंदादीपापासून , विजेच्या दिव्यापर्यंत घरात दिवे असतात पण ; खिडकीतून हळूच आत येणाऱ्या चांदण्याचा आनंद या दिव्यांच्या प्रकाशात नसतो."

"उषा हे माझ्या दृष्टीने देवाला वाहिलेलं फुल होतं ; ज्याला हात लावायचा नाही , ज्याचा वास घ्यायचा नाही , अशा फुलाच्या दर्शनाने कोण सुखावील ?"

"पुरुषाचा मोठेपणा घराबाहेर असतो , घरात तो लहानच असतो."

"प्रेम हे मद्य आहे. प्रेम हे मृगजळ आहे."

"तरुणी हे गुलाबी कोडं आहे."

"मनातल्या मनात प्रत्येकजण कवी असतो ; कोणी कविता करतो , कोणी करत नाही एवढाच काय तो फरक !"

"आयुष्य हा जुगार आहे."

"ज्याचा आग्रह करावा अशी एकच गोष्ट आहे या जगात 'सत्य' ."

"केवळ स्वतःसाठी जगणं ही आत्महत्या आहे."

"सवडीनं येणारी माणसं परत कधीच येत नाहीत."

"काही माणसं अभिमानावर जगतात , पैशावर नाही."

"मनुष्याने बेभान होऊन जखम करणं निराळं आणि आपण केलेल्या जखमेतून वाहणारं रक्त शांतपणे पाहणं निराळं."

"सौंदर्य कधी कधी भयंकर असतं."

"आयुष्य हा खेळ नाही , लढाई आहे."

"गुलामाला हक्क नसतात हेच खरं."

"त्यागानं देवता प्रसन्न होतात , भुतं नाहीत."

"जिवंत मन मर्यादा जाणत नाही."

"काही सावज पकडता येत नाहीत."

"जीवन दुःखमय आहे तरी , मनुष्य किती धडपड करतो ; त्याचं ते धडपडत जगणं काजव्याच्या लुकलूकण्यासारखं असतं."

"स्त्रीचं सारं पावित्र्य तिच्या पदरात असतं."

"जीवाला जीव द्यायचा असतो , मातीला जीव नाही."

"समाजसेवा हा कित्येकांना कीर्तीचा राजमार्ग वाटतो.
शेंदूर लावलेला दगड पाहिला की , लोकांचे हात आपोआप जोडले जातात.
त्यागाशिवाय खरी समाजसेवा जगात शक्य नाही."

"दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यात केवढा आनंद असतो."

"सेवा जग फुलविते आणि प्रीती मन फुलवते."

"जगात तात्काळ मिळणारी खूप विषं असतात."

"प्रिय माणसापासून आनंदाने कुणी दूर जाईल का !"

"आयुष्य हे गणिताच पुस्तक नाही , ती एक विचित्र कादंबरी आहे."

"स्त्रीचा शृंगार पुरुषांच्या सुखाकरिता असतो , अंगावरले दागिने या तिच्या गुलामगिरीच्या शृंखला असतात."

"माणसाचं आयुष्यं थोडंतरी कादंबरी सारखं असावं."

"पेरल्याशिवाय उगत नाही हा नियम सुखलाही लागू आहे."

"दुःख हेच मनुष्याला लवकर अंतर्मुख करत."

" 'त्याग' हा प्रीतिमंदिराचा 'कळस' आहे आणि 'भोग' हा 'पाया' आहे."

"समाजसेवा हे प्रीतीचेच विशाल रूप आहे."

"प्रेम हाच या जगातला परमेश्वर आहे."

"खालच्या वर्गाची सेवा करायची तर , आपल्या वर्गाचा अभिमान सोडावा लागतो."

"सुख दोनच माणसांच्या जगात असतं."

( ऋण - मिलिंद फाटक )
'विसं' सदैव नमन _/\_

पुस्तकाचे नाव - ''सुखाचा शोध''
लेखक - 'विष्णू सखाराम खांडेकर'
पृष्ठे - ११२
मूळ प्रकाशन वर्ष - १९३९
सद्य प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
स्टोरीटेल प्रदर्शन - २०१९ मिलिंद फाटक यांसोबत.
स्टोरीटेल अभिवाचन कालावधी - ०३ तास १० मि.

Friday, June 18, 2021

धोंडी


                                पुन्हा गोनीदां ! 'पडघवली' , 'जैत रे जैत' नंतर गोनीदांची लाघवी बोली न्याहाळत राहावी अशीच वाटते. धोंडीबद्दल सुरुवातीपासून एक उत्सुकता होती. प्रवाहासोबत वाहायचं नाकारणाऱ्याला धोंडीला प्रत्येकाने भेटलं पाहिजे असं वाटतं. १७ जून २०२१ रोजी 'पवनाकाठचा धोंडी' हे 'गो. नी. दांडेकर' यांचं पुस्तक वाचलं. मराठी साहित्यातील आणखी एका अप्रतिम कलाकृतीचा आस्वाद घेतला. 'धोंडी' हे या कथेतील एक पात्र. जरा पत्र वगैरे लिहून हवालदारांचा मान पान करू म्हटलं !!


डिअर धोंडी ,

                                प्रत्येक वाचकाला हेवा वाटावा असा तू 'धोंडी'. पवन मावळात तुला इतका मानपान का आहे हे कळायला प्रत्येकाला धोंडी हवालदार म्हणून एक दिवस तरी जगता आलं पाहिजे. धोंडी , दुसऱ्याचं रान पडू नये म्हणून इरजीक बेतणारा तू जेव्हा स्वतःच्या रानात स्वाभिमानापोटी स्वतः बैलासारखा खपतोस आणि त्याच काळ्या आईच्या कुशीत श्वास सोडतोस तेव्हा खरंच तुझा हेवा वाटतो. तुंगी गडाचा मनापासुन , निस्वार्थीपणे सांभाळ करतोस ; मोबदला एवढाच की लोकांनी तुला 'हवालदार' म्हणावं , तुझी विचारपूस करावी , गड पाहायला तुझी परवानगी घ्यावी ! सरकारकडून तुला मिळतो त्याला नजराणा समजून , इतक्या वर्षांनंतरही अगदी गर्वाने शिवाजी राजाच्या ऋणात जीवन जगणारा तू पवना नदीतला मोतीच जणू !

                                कोंडीला लेकरासारखं पोटाजवळ घेतलंस , सारजेनं तर कोंडीसाठी काय नाही केलं ! पण ; तो तुझ्यापेक्षा फार वेगळा. तुझ्यासारखं तत्वांसाठी रक्त जाळायला त्याला काय , कुणालाच जमायचं नाही. कोंडी पुढल्या जगात राहणारा माणूस. स्वतःचा दुधधंदा करून त्याने पैसे मिळवले खरे पण ; गोरस विकणं हे पाप आहे असं जेव्हा तू सांगतोस तेव्हा तुझी जनावरांवरची माया कळते. सारजेवर तुझा कितीतरी जीव ; तिची शेवटची घटका पाहिलीस तू पण , कोंडीचा पाण्याचा एक पैसा घेतला नाहीस. म्हणूनच काय ते 'कोंडी ढमाले' म्हटलं की लोकं इब्रतीनं वागतात.

                               सरू सारखी पोर घरात आणून तिला तू जी माया , आपलेपणा आणि जबाबदारी दिलीस त्यावरून कळतं घराचं वात्सल्य चिरंतर राहावं म्हणून इतकी वर्षं किती राब-राब राबलास.

                              धोंडी , तुझ्यातला स्वाभिमान , तुझ्यातला ठामपणा , तुझ्यातलं प्रेम , तुझी मेहनत , तुझ्या मनाचा मोठेपणा , तुझं तत्वनिष्ठ जगणं सारं-सारं प्रत्येक वाचकाला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडतं. तू प्रवाहासोबत वाहत नाहीस खरा पण ; तुझ्या 'असण्या'वर तटस्थपणे ठाम राहतोस हे भारी थोरपण आहे तुझं !

( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

Tuesday, June 15, 2021

बनगरवाडी


                              'व्यंकटेश माडगूळकर' यांचे नाव मराठी साहित्यिक , रसिक आणि वाचक मोठ्या आदराने घेतात. माडगूळकरांची शैलीच एवढी न्यारी. वाचणाऱ्याने भान हरवून माडगूळकर म्हणतात तिथे गेलंच पाहिजे अशी त्यांची ठेवण. आणि मग शेवटचं पान पलटलं की , आपण जागे होतो आणि राहून राहून माडगूळकरांच्या प्रेमात पडतो. १४ जून २०२१ रोजी 'व्यंकटेश माडगूळकर' यांची 'बनगरवाडी' ही कादंबरी वाचली. १९५५ साली लिहिलेल्या या कादंबरीवर आधारित चित्रपटही १९९५ ला प्रदर्शित झाला. ही कथा एक शाळा मास्तर आणि एक वाडी यांच्यातील कथानक आहे.

                              राजाराम नावाचा तरुण , उमदा शिक्षक बनगरवाडीला रुजू होतो. हळूहळू तिथे रमून जातो. मुलांना शिकवायला गेलेला हा शिक्षक माणूस गावचा आधार बनतो. गावातली पोरं सोरं , म्हातारी माणसं सगळी सगळी मास्तरच्या भोवतीने ! मास्तरनी हा अधिकार आणि मान गावातल्या माणसांच्या नडीला येऊन मिळवलेला असतो. कालांतराने मास्तर गावचा माणूस होऊन जातो. अडल्या गावकऱ्याच्या कामाला येणं , गावकऱ्यांंची मर्जी सांभाळणं , कारभारीच्या मदतीने सगळे निर्णय घेणं , आयबू सारख्या एकट्या मुलाला घरातल्या माणसाप्रमाणे मास्तर वागवत , रामाचे पैसे मोडून आणणे , आनंदा रामोशी म्हणजे वेगळीच कमाल आणि शेवटी तालीम बांधवून घेणे अशा कैक आठवणी , सुसंवाद , आपुलकी बनगरवाडी सोबत झाली होती मात्र ; शेवट फारच उदास करून जातो. दुष्काळात बनगरवाडी पोरकी होते. कुणी कुणी गावात उरत नाही. काकोबा एकटा असतो त्याला रामराम करून शेवटी मास्तरही तालुक्याच्या गावात बदली होऊन जातात.

                             हा एकूण प्रवास इतर कुणी सांगण्यापेक्षा किंवा लिहिण्यापेक्षा माडगूळकरांच्या लेखणीतून वाचणं म्हणजे एक सुखद अनुभव ! कारभारी कसा तत्वाला धरून आहे , त्याची आंजी कशी आहे , रामा बनगर माणूस म्हणून कसा आहे , नडीला चोरी करून नंतर येऊन स्वतःच खुलासा करणारा आनंदा कसा आहे , आयबू , शेकू , शेकूची बायको , जगन्या , रामोशी वाडी , वांगीची लोकं , दादू बालट्या , गावाबाहेरचा बाळा आणि मेंढक्यांची लेकरं म्हणजे 'शेरडं' त्यांचं रोजचं जगणं , वाडीतला रोजचा प्रत्येक प्रहर आणि वाडीतल्या रीती भाती जसं की , एकाचवेळी सगळ्या गावची सगळी लग्नं उरकण्यामागचं कारण असो किंवा देवीची यात्रा असो की , गावातल्या गावात न्याय होत नसेल तर अख्ख्या धनगरांच्या वडीलधाऱ्यांना बोलावणं घालणं असो अशा कित्येक गोष्टी वाचकाला बनगरवाडीकर बनवून जातात.

                             मनाला खूप भावते ती माडगुळकरांनी वर्णिलेली बनगरवाडी ! म्हणजे अगदी गुण्यागोविंदाने राहणारं गाव जेव्हा कोरडं पडलेलं समोर दिसतं तेव्हा जाणवतं बनगरवाडी मराठी साहित्यातील मानाची , श्रेष्ठ कादंबरी का आहे ते ! म्हणून वेळ काढून बनगरवाडीला एकदा तरी जाऊन आलंच पाहिजे.

( ऋण : चंद्रकांत कुलकर्णी )
सदैव नमन 'माडगूळकर' _/\_

Monday, June 14, 2021

नाग्या




'जैत रे जैत' हा स्मिता पाटील , मोहन आगाशे , निळू फुले , सुलभा देशपांडे यांचा १९७७ साली प्रदर्शित झालेला अनोखा चित्रपट. त्यातील 'आम्ही ठाकर ठाकर' , 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' , 'नभ उतरू आलं' , 'लिंगोबाचा डोंगुर' , इ. भन्नाट गाणी आजही मराठी रसिकांना वेड लावतात. हा चित्रपट 'गो. नी. दांडेकर' यांच्या 'जैत रे जैत' या कादंबरीतील कथेचं रूप आहे. मंडळी १२ जून २०२१ रोजी माझं ठाकरवाडीला जाणं झालं. नाग्या हा या कथानकातील नायक आणि चिंधी ही त्याची सोबतीन. ठाकरवाडी पाहून आल्यावर कधी एकदा नाग्याला पत्र लिहिन असं झालं होतं ; म्हणून...

डिअर नाग्या ,

कमालीचा ढोलीया आहेस यार नाग्या तू ! उगाच का चिंधी सगळं सोडून तुझ्याकडे आली !! आयशीच्या पोटात असल्यापासून तुझं जणू प्रशिक्षण चालू होतं ढोलीया बनण्याचं. बा सोबत रानात जाऊन रोज एकेक विद्या जणू गोळा करत होतास. तसा तू भगत पण लिंगोबाशी तुझा वेगळाच मैतर गड्या !

नाग्या , तुला माहितीये का अख्या ठाकरवाडीच्या इतिहासात कुणी जे केलं नाही ते तू केलंस ; कुणामुळे माहितीये का , तुझ्या बा मुळे ! बा नं तुला पुण्यवंत होण्याचा मंत्र दिला , तू तो उगाळून प्यायलास म्हणून हे अद्भूत शक्य झालं. चिंधीच्या तुझ्याविषयीच्या प्रेमामुळे तिनं शेवटी तुला जखमाळलेल्या अवस्थेत 'राणी माशी उडाली , तुझा जैत झाला नाग्या' सांगितलं , तेव्हा नकळत सोबतीन असण्याचा अर्थ कळून जातो.

तू निश्चय केलास , तुला राणी माशी डंकली म्हणून तू राणी माशीला डंकलास ; नाहीतर जो नाग्या राणी माशी कधी दिसलीच तर तिला डोकं टेकून पाया पडायचा तो का बरं त्याच राणी माशीच्या जीवावर उठेल. पण नाग्या प्रचंड निश्चयी आहेस रे तू. हा यावरून आठवलं , झाडावर चढण्याआधी तू जमिनीवर डोकं टेकून म्हणायचास , '' झाड देवा , हिरव्या ढाप्याला धक्का सुद्धा लावणार नाही , वाळलेली काडी बघून बघून काढून घेतो , काय चुकलंच तर माफ कर ''. लिंगोबाच्या डोंगरावर चढतानाही तेच , कितीवेळा माफी मागितलीस. तुझ्या बा ला साप चावला आणि बा देवाघरी गेला तेेव्हाही तू सापाला जाब विचारलास , ''जेव्हा जेव्हा रानात तू दिसलास तेव्हा तुझ्या पाया पडलो , तुझ्या वाटेतून बाजूला झालो ; माझं काय चुकलं म्हणून आज माझ्या बा ला तू डकलास साप देवा ? '' ( मुक्या जीवाला मारणं खूप दूर , दुखावनं सुद्धा तुझ्याच्याने शक्य नाही बघ )  निसर्गासोबतचं तुझं हे नातं अचंबित करणारं आहे रे.

डोळा फुटलेला , रूप कोलमडलेलं असलं तरी जीव ओवाळून टाकणारी चिंधी , तिला सोबत घेऊन पुण्यवंत बनायला निघालेला तू. भल्या मोठ्या बैलावर बसलेला म्हादेव बघून तुला भगवंताचं दर्शन घ्यायचं होत खरं पण बा च्या शिकवणीला अर्थही लावायचा होता. कमालीचा ढोलीया तू , ठाकरांचा लाडका भगतही तू , चिंधी सारखी सोबतीन मिळणारा नशीबवानही तूच आणि लिंगोबानं कुशीत घ्यावं , सतत तुझ्या जवळ राहावं इतका पुण्यवंतही तूच !

निसर्गाला देव म्हणणारा तू , तुझ्यासारखं निसर्गाला जपणं आम्हाला जमेल का रे ? हिरवीगार झाडं तोडताना आम्ही माफी कधी मागणार ? डोंगर खोदताना आम्हाला त्यात देव कधी दिसणार ? नाग्या लिंगोबाच्या एका बाजूला झाडं , डोंगर , लहान-सहान जीव , सर्प-नाग यांची माफी मागणारी , त्यांना दुखावू नये म्हणून काळजी घेणारी तुझी ठाकरवाडी होती आणि त्याच लिंगोबाच्या दुसऱ्या बाजूला कोरडी , भकास आणि बेफिकीर वाढत चाललेली एक दुनिया आहे ; नाग्या , ठाकरवाडीची ही बुद्धी आम्हाला कधी प्राप्त होईल का रे ?

( ऋण : वीना देव , विजय देव )
सदैव नमन 'गोनीदां' _/\_

Friday, June 11, 2021

अंबी



१० जून २०२१ रोजी 'गो.नी.दांडेकर' यांच्या 'पडघवली' ला जाणं झालं. ९ वी - १० वी मध्ये अंबीबद्दल फारच थोडं ऐकलं होतं तेव्हापासून तिला भेटायची ईच्छा होती. एकदाची अंंबीला भेटून आले. अंबी ही या कथेतील एक व्यक्ती , जी वाचकाला पडघवलीचं दर्शन घडवते. तिच्यासाठी पत्र.

डिअर अंबी ,

तू माझं म्हणणं ऐकलंस असंच वाटलं , जेव्हा तू गणू भाऊजींंना 'मी नाही जाणार' असं सांगितलंस. गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याबरोबर खेळणारी अंबी ते गावची खोतीन , सगळ्या पडघवलीची वयनी ; हा तुझा प्रवास पाहिला की , तुझ्यावरचं प्रेम कसं अजूनच वाढतं बघ. 

अल्लड वयात लग्न करून आलीस. काही - काही कळत नव्हतं ( आक्कीला कामं सांगणं सोडून ) तेव्हापासूनच खोतांची , गावातल्या वडील घराची तू सून. तुझं माहेरपण चालू असतानाही मामंजींनी तुझा ध्यास घेतला , इतक्याश्या वयात सगळ्यांना लळा लावतेस तेव्हा हेवा वाटतो तुझा खरंच. इतकी वर्षं व्यंकू भाऊजी कोणाला कळले नाहीत ; पण तुला पंगत वाढताना तुझ्याकडच्या त्यांच्या एका नजरेत तू त्यांना ओळखलंस आणि जे तू ओळखलंस तेच पुढे सर्वांनी पाहिलं.

'म्हाद्या धांद्रट आहे' हे मामंजींच्या शेवटच्या बोलण्यातले शब्द बरोबर घेरून , त्याचा अर्थ ओळखून संसार सांभाळलास. अंबे जी कुशी आत्या तू रंग्यावर हसलीस म्हणून आत्ते सासुबाईंकडे तुझी तक्रार करायला आली होती तीच कुशी आत्या मरणाच्या घडीवर सगळी व्यवस्था तुझ्याकडे देते तेव्हा मन भारावून येतं. धर्मी सुद्धा किती विश्वासानं तुलाच येऊन बोलते. कशी गं तू अंबे !!

गणू भाऊजी , बनू वन्सं यांच्याशी तुझं वेगळंच सौख्य. भिऊ अण्णाची शारदा देखणी नि तुला ती भारी आवडते हे जेव्हा तू मन्मनी बोलतेस तेव्हा तुझ्यातल्या निरागसतेचं दर्शन होतं गं. गुजा भाऊजीनी तुला एक लेकरू म्हणून शेवटपर्यंत साथ दिली. तुझा नवरा आंब्याची गलबतं बुडाल्याचं कळल्यावर देवाघरी जातो आणि तू उघडी पडतेस पण ; खोतीन म्हणून खंबीर उभी असतेस , हे पाहिलं की वाटतं तुझ्यासारखी अंबी प्रत्येक बाईत हवी. तू अशी आहेस म्हणूनच आत्ते सासूबाईंची जिवाभावाची होतीस. ( आणि आता प्रत्येक वाचकाची सुद्धा )

तुला एक सांगू ? आजकाल सगळ्या पडघवल्या आंबूडी सारख्या झाल्यात. तुझी शप्पथ सांगते , सगळ्या वाटासुद्धा पोरक्या झाल्यात. मुंबई वाढलीये आता. सगळीकडे एक ना एक मुंबई तयार आहे. माड , पोफळी , सुपारी , बागा सारं सारं ओसाड झालंय अंबे. तुझ्या पाण्यावर वरच्या बाजूलाच बांध घातला होता म्हणून तुझ्या बागा कोरड्या पडत होत्या पण ; इथं तर बांध न घालताही सगळं कोरडं पडतंय. तुझ्या घराजवळ कुणाला साधी खोक जरी पडली तरी तुझा सगळा वावर गोळा व्हायचा , इथं कुणी गेलं तरी कुणी कुणाला दखलत नाही. 

एवढं सगळं महाभारत पडघवलीत होऊनही तू कोळ्याच्या काळूला जेव्हा तुझा बोजा बोटीतून उतरायला लावून 'पडघवली सोडणार नाही' म्हणतेस तेव्हा अंगावर काटा येतो. अंबे तुझ्यामुळे साऱ्या पडघवल्या वाचतील , टिकतील ; यात तसूभरही शंका नाही.

( ऋण : वीना देव , विजय देव , मधुरा देव , रुचिर कुलकर्णी )
सदैव नमन गोनीदां _/\_

"Seminar Report : Reforms in Criminal Laws"

One-Day Workshop on : Reforms in Criminal Laws (Under the lead college scheme of Shivaji University, Kolhapur) Date: 18th March 2025 Venue:...